गडचिरोली : बहुचर्चीत सुरजागड जनसुनावनीवर अनेक प्रश्नचिन्ह

133

– सुनावनीत अनेकांना डावलले, पत्रकारांनाही नो एन्ट्री
The गडविश्व
गडचिरोली, २८ ऑक्टोबर : जिल्हयातील बहुचर्चीेत असलेल्या सुरजागड लोहखदान प्रकल्पाच्या वाढीव उत्खननाकरिता पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात काल २७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात पर्यावरण विषयक जनसुनावनी पार पडली. मात्र या जनसुनावनीवर अनेक स्तरातून प्रशनचिन्ह उपस्थित केल्या जात असून सुनावनीत अनेकांना डावलले त्या सोबतच्या पत्रकारांनाही प्रवेश नाकारल्याने शासनाच्याही कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
सुरजागड प्रकल्पात लॉयड मेटल कंपनीव्दारे लोह खनिजाचे उत्खनन केले जात आहे. कंपनीने अतिरिक्त उत्खनन करण्यासाठी मागणी केली आहे. या अतिरिक्त उत्खननाने परिसरातील तब्बल १३ गावे प्रभावित होणार असून नागरिकांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. अतिरिक्त उत्खनन करण्यासाठी पर्यावरण विषयक जनसुनावनीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदर जनसुनावनी एटापल्ली तालुक्यात घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलीे होती मात्र तसे न करता जिल्हा मुख्यालयी काल २७ ऑक्टोबर रोजी जनसुनावनी घेण्यात आली.
मात्र सदर जनसुनावनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. सदर सुनावनीला फक्त १३ गावातील लोकांनाच प्रवेश देण्यात येत होता मात्र असे असतांनाही आधार कार्ड असेल तरच आधार कार्ड वरील पत्ता तपासूनच प्रवेश देण्यात येत होता. सदर सुनावनी दरम्यान पत्रकारांनाही प्रवेश नाकारण्यात आला होता त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे तर जिल्हयातील नागरिकांमध्ये अनेक सभ्रम निर्माण होत आहेत.
या जनसुनावनी दरम्यान पोलीसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. जिल्हा मुख्यालयाच्या दुरवरून जनसुनावनीला येणाऱ्यांची तपासणी करण्यात येत होती. केवळ आधार कार्ड असेल तरच प्रवेश देत असल्याने येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी आधार कार्ड न आणता पॅन कार्ड आणले होत मात्र तरी सुध्दा प्रवेश दिला गेला नाही. एवढा मोठा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता तर मग आधार कार्डची ओळख पटविण्यासाठी असेलेले तंत्रज्ञान का उपलब्ध करण्यात आले नाही ? हा सुध्दा प्रश्न उपस्थित केल्या जात होता. सदर सुनावनीला येतांना आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय प्रवेश नाही असे सुध्दा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले नाही त्यामुळे गावातील काही नागरिकांनी पॅन कार्ड तर काहींनी आधार कार्ड सोबत ठेवले.

जनसुनावनीत या मुद्दयांवर चर्चा

रोजगाराची संधी निर्माण करून देण्यात यावी, शाळा महाविद्यायल सुरू करण्यात यावे, मोठे रूणालयाची व्यवस्था करण्यात यावी, रस्त्यांची दुरूस्ती, शेतकऱ्यांसाठी सौरपंप उपलब्ध करून देण्यात यावे, प्रकल्पातील लाल पाणी मलबा शेतात घूसू नये यासाठी प्रयत्न करावे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या दरम्यान नागरिकांच्या मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वस्त प्रकल्प संचालकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here