१५ नोव्हेंबर पूर्वी धोपटाळा प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे मंजुरी आदेश जारी होणार : माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर

200

– ग्रॅन्डसन विषयक नोकरीचा प्रश्न लवकरच मार्गी  
 बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक निर्णय
The गडविश्व
चंद्रपूर, ८ नोव्हेंबर : पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोज कुमार, कार्मिक निदेशक संजय कुमार, महाप्रबंधक(औस) देशकर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागपूर मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत धोपटाळा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या नौकऱ्यांचे  आदेश १५ नोव्हेंबर पूर्वी जारी होणार असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
यावेळी प्रकल्प प्रभावित गावांतीलस शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनींची संपादन प्रक्रिया, ग्रॅन्डसनशी संबंधीत नोकरीचे प्रलंबित प्रकरणे, धोपटाळा वेकोलि प्रकल्पांतील तुकडेबंदी कायद्यान्वये झालेले फेरफार प्रकरणातील न्यायालयीन प्रकरण व अन्य महत्वपूर्ण विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीमध्ये हंसराज अहीर यांनी अनेक प्रलंबित प्रकरणामध्ये वेकोलि प्रबंधनाव्दारे वारंवार चर्चा, बैठका होवुनही निर्णय घेण्यात विलंब होत असल्याबद्दल खेद व्यक्त करित प्रकल्पग्रस्तांच्या हिताशी संबंधीत प्रकरणामध्ये तडजोड खपवून घेतली जाणार नाही अशी भुमिका घेतांनाच उपरोक्त प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी असे अधिकाऱ्यांना  सुचविले. यावेळी मुख्यालयाव्दारे वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा प्रकल्पातील नौकऱ्यांच्या  प्रस्तावास मंजुरी प्रदान करुन येत्या १५ नोव्हेंबर पूर्वी ५० प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश जारी करण्यात येतील असे सांगितले तसेच कोलगाव, पौनी, सास्ती, माथरा, गाडेगाव आदी प्रकल्पपिडीत गावातील उर्वरित शेतजमिनी संपादित झालेल्या नाहीत त्या जमिनींचे सीएमपीडिआय  व्दारे लवकरच सर्वेक्षण करुन संपादन प्रक्रीया राबविली जाईल असे आश्वासन दिले. ग्रॅन्डसन संबंधातील सर्व प्रलंबित नौकऱ्यांची  प्रकरणे वेकोलि बोर्डाची मान्यता घेवून मार्गी लावण्याचे मान्य केले.
धोपटाळा परियोजनेतील तुकडेबंदी कायद्यान्वये फेरफार प्रकरणात प्रबंधनाव्दारे दाखल न्यायालयीन केसेस मागे घेण्यासंदर्भात वेकोलि प्रबंधन गांभीर्याने विचार करेल अशी भुमिका सिएमडी व्दारा व्यक्त करण्यात आली. बी.पी, शुगर व अन्य कारणांमुळे अपात्र केलेल्या नामनिर्देशित प्रकल्पग्रस्तांना सिआयएल च्या  ०३ ऑगस्ट २०२२ रोजीचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा अशी सुचना हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना केली असता वेकोलि अधिकाऱ्यांनी  सदर प्रावधान लागु करण्याकरिता कोल इंडीया कडे पाठपुरावा करावा असे अधिकाऱ्यांना  सुचित केले. या संदर्भात आपण कोल इंडीया व कोल मंत्रालयाकडे आग्रह धरु असेही हंसराज अहीर यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
सदर बैठकीस वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, ॲड. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, मधुकर नरड, सुनिल उरकुडे, शरद चाफले, पुरुषोत्तम लांडे, गौतम यादव, चिंचोली, धोपटाळा व अन्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here