गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

167

– शेतकरी मृत्यू तसेच आपघातानंतर आर्थिक मदत देणारी शासनाची योजना
The गडविश्व
गडचिरोली, २२ मे : शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विज पडणे, पूर सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे ब-याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतक-यांस त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य यात आई-वडील, शेतकऱ्याची पती किंवा पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकुण २ जणांकरीता “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. सदर योजना १९ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ व आवश्यकतेनुसार प्रथम ३ वर्षे राबविण्यात येणार आहे.
कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतक-याच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य असे एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत खालील लाभ अनुज्ञेय असतील. अपघाती मृत्यू झााल्यास २ लक्ष रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झााल्यास २ लक्ष रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झााल्यास २ लक्ष रूपये तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झााल्यास १ लक्ष रूपये अर्थिक साहाय्य दिले जाते.

अपघातांचा समावेश असणाऱ्या बाबी : यात रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, विज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात, या अपघातांचा समावेश असेल.

अपघातांचा समावेश नसणाऱ्या बाबी : नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असतांना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा समावेश असणार नाही.

आवश्यक कागदपत्रे : ७/१२ उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं.६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. वारसदाराचे ओळखपत्र आधारकार्ड / पॅनकार्ड / बँक पासबुक /निवडणूक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र / ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र / आधारकार्ड / पॅनकार्ड / वाहन चालविण्याचा परवाना / पारपत्र / निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र, प्रथम माहिती अहवाल / घटनास्थळ पंचनामा / पोलीसपाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.

जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे ३० दिवसाच्या आत सादर करावा. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

वारसदाराची निवड – अपघातग्रस्ताची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रास्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here