– गडचिरोली येथे महिलांचा भव्य उद्योजक मेळावा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ५ : आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योग निर्मिती व्हावी नवीन उद्योजक व्हावे यासाठी २०१७ मध्ये उद्योग क्रांती यात्रा काढून जिल्ह्यातील तरुण-तरुणींना व महिलांना उद्योजक बनविण्यासाठी काम केले. त्यातूनच आज जिल्हयात नवनवीन उद्योग येत असून त्यातून हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उत्पन्न झालेल्या आहेत. जिल्ह्यातील महिलांना लखपती दीदी उद्योजक बनवून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील लखपती दीदी महिला उद्योजक मेळाव्याच्या प्रसंगी केले.
यावेळी मंचावर गाव माझा उद्योग फाउंडेशनचे संस्थापक पवन वानखेडे, अष्टगाथा वानखेडे सहसंचालिका गाव माझा उद्योग फाउंडेशन, राजकपूर भडके रिजनल मॅनेजर वर्षा मोरे संपर्कप्रमुख शिवसेना (शिंदे) यांचे सह गाव माझा उद्योग फाउंडेशनचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये विकासाची दृष्टी ठेवून मागील १० वर्षापासून काम करीत आहोत. जिल्ह्यामध्ये नव-नवीन उद्योग यावे या जिल्ह्यातील तरुणांना महिलांना उद्योगाची संधी मिळावी यासाठी आपण काम केले आहे. त्यातूनच कोणसरी सुरजागड सारखे मोठे लोह प्रकल्प जिल्ह्यात आलेले आहेत. एमआयडीसीच्या परिसरामध्ये शेकडो नवीन उद्योजकांना आपण जागा मिळवून दिली आहे. त्यातील अनेकांचे नवीन उद्योग सुरू झाले आहेत, पुन्हा नव्याने महिलांना उद्योजक बनवण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे आणि येत्या काळामध्ये महायुती सरकारच्या ध्येय धोरणांमुळे असंख्य नवीन लखपती दीदी तयार होतील असा मला विश्वास आहे. मी मातृ भगिनिंच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असून आपल्या सर्व मातृ भगिनींना उद्योग मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तसेच आपणही माझ्यामागे खंबीरपणे उभे राहून मला ताकद द्यावी असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
