The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १७ : तालुक्यातील येरकड गावातील सहारे कुटुंबातील एक महिला “माहेरी जाते” असे सांगून घरातून निघून गेली. मात्र, ती माहेरी पोहोचलीच नाही. तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळली नाही. ही बाब मनावर घेत पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ मार्च रोजी धानोरा तालुक्यातील येरकड येथे घडली. शीलवंत आनंदराव सहारे (२७, रा. येरकड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
घटनेच्या वेळी मयताची आई शेजारच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. ती पाणी पिण्यासाठी घरी आली असता, आतून दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. मागच्या दाराने घरात प्रवेश केल्यावर तिला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
शीलवंतने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सखोल चौकशीनंतर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.
