चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नाल्यावरून दुचाकी गेली वाहून, तिघेजण बालबाल बचावले

1921

– शॉर्टकटने ओढवले संकट
The गडविश्व
गडचिरोली दि. २५ : नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना गडचिरोलीहून नागपूरला जाणाऱ्या तिघांवर प्राण गमावण्याची वेळ आली होती. परंतु ही बाब स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळताच त्यांनी तत्परता दाखवून संबंधित तीघांचे प्राण वाचवले. ही घटना आज २५ जुलै रोजी चुरचुरा माल येथे चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नाल्यावर सायंकाळच्या सुमारास 7 ते 8 दरम्यान घडली. दरम्यान यावेळी त्यांची दुचाकी वाहन पाण्यात वाहून गेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सततधारेने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अनेक मार्ग बंद झाल्याने पर्यायी मार्गाचा वापर अनेक नागरिक करीत आहे. आज 25 जुलै रोजी चुरचुरा माल येथे चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नाल्यावरील पाणी वाहत असताना नागपूर येथील रहिवासी राहुल किशोर मेंढे (वय 32), आशा किशोर मेंढे ( वय 65) व त्याचा भाचा दत्तश्री शरद गोडे (वय 12 वर्ष) हे तिघे आपल्या दुचाकीने गडचिरोली वरून नागपूर ला जाताना नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकून काही अंतरावर वाहत गेले. त्याच वेळी त्यांनी गावातील जवळ असलेल्या लोकांना हाक दिल्याने चुरचुरा येथील तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी यांनी जीवाची पर्वा न करता त्या तिघांचे प्राण वाचविले.
त्यानंतर जिल्हा पथके, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली ची चमू तहसीलदार हेमंत मोहरे, मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्रीमती भुरसे यांनी त्यांना गावात आणून कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, CHO, आशा स्वयंसेवक, आपदा मित्र, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी संबंधित नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे.
पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #fludgadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here